Home महाराष्ट्र एस टी कामगारांना नोकरीवरून काढू नका नाही तर…; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून...

एस टी कामगारांना नोकरीवरून काढू नका नाही तर…; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत संप सुरु आहे. राज्य सरकारनं महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवण्याची मागणी मान्य केली असली तर एसटीच्या सरकारमधील विलिनीकरणाबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुचक इशारा दिला आहे.

हे ही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर करणार नव्या घरात ‘गृहप्रवेश’ !

एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, अशी मागणी राज ठाकरेंनी या पत्रात केली.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जशाच्या तसं :

कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच, एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारांमध्ये काम सुरु आहे, तिथेही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत, ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा वापर करुन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्यात येत आहे’.

‘एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टीमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे. आज गरज आहे ती एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची. एसटी कर्मचारी, कामगार जगला तरच एसटी जगेल, हे भान बाळगण्याची. माझी आपणाला आग्रहाची विनंती आहे की, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल’.

‘माझ्या या मागणीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार कराल आणि योग्य ते आदेश परिवहन मंत्री तसंच महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना द्याल हीच अपेक्षा’.

महत्वाच्या घडामोडी – 

“भाजपा-शिवसेना युती होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली”

“दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले”

पालघरमध्ये होणार विमानतळ; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा