कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात सध्या एका नव्या चर्चेने जोर धरला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची वाढती राजकीय सक्रियता आणि विविध पक्षांच्या नेत्यांशी असलेला संपर्क यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची याबाबत नाराजी असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा अशी की, मुख्यमंत्री असोत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असोत, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे असोत किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असोत, अनेक महत्त्वाच्या बैठका, कार्यक्रम आणि चर्चांमध्ये समित कदम यांची उपस्थिती सातत्याने दिसून येते. त्यामुळे “प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय घडामोडीत समित कदमांची मध्यस्थी का?” हा प्रश्न अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेषतः गोकुळ दूध संघाच्या घडामोडींमध्ये समित कदम यांची भूमिका चर्चेत आली. गोकुळच्या बैठका आणि संबंधित राजकीय हालचालींमध्ये त्यांचा थेट संबंध नसताना देखील ते समन्वयक म्हणून पुढे येत असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या विषयावरून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची भूमिका घेतली होती.
मात्र, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, या वादाची तीव्रता वाढू नये यासाठी समित कदम यांनी पडद्यामागे समन्वय साधण्याचा आणि दोन्ही बाजूंमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. काहींच्या मते, याच भूमिकेमुळे आमदार शिवाजी पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
समित कदम हे केवळ पक्ष संघटनेपुरते मर्यादित न राहता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध सामाजिक, सहकारी आणि राजकीय प्रश्नांमध्ये सक्रिय भूमिका बजावताना दिसतात. युवकांमध्ये त्यांची वाढती लोकप्रियता आणि विविध स्तरांवरील संपर्कक्षमता यामुळे त्यांचा प्रभाव वाढत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
दुसरीकडे, स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक राजकीय भूमिकेसाठी ओळख असलेले आमदार शिवाजी पाटील हे कोणत्याही विषयावर थेट भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे समित कदम यांच्या वाढत्या प्रभावाबाबत त्यांच्या मनात नाराजी असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे.
- या सर्व चर्चांमध्ये कोणत्याही नेत्याने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली, तरी “हे पाटील आणि ते पाटील” हा विषय सध्या कोल्हापूर-सांगलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि सहकारी क्षेत्रातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

